Wednesday 24 February 2016

मराठी राजभाषा दिन

school_of_athensसंग्रहित --श्री.नामदेव वाजे 
(आश्रमशाळा मोहपाडा  सुरगाणा )




रोम मधील व्हेटीकन म्युझियम मध्ये एक ‘स्कूल ऑफ अथेन्स’नावाचं जगभरात प्रसिद्ध पावलेलं मध्ययुगीन चित्र आहे. चित्रकाराची कल्पकता अशी की त्याने प्राचीन ग्रीस मधील वेगवेगळ्या कालखंडातील उत्तुंग व्यक्तिमत्वे एकत्र चितारली आहेत – त्यात अरीस्टोटल, प्लेटो सारखे तत्वज्ञ आहेत, आर्किमिडीज आदी गणितज्ञ आहेत आणि अलेक्झांडर सारखा जगज्जेता देखील! मला स्वत:ला असंच एखादं महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर काढलेलं चित्र बघायला खूप आवडेल. रायगड किंवा राजगडाच्या पार्श्वभूमीवर जमलेला मराठी जनांचा मेळा! त्यात हिऱ्याच्या लखलखत्या रत्नहारासारखी पल्लेदार संवाद लिहिणारे राम गणेश गडकरी असतील, तर शेजारीच त्याच लखलखत्या हिर्याचे धगधगते तोफगोळे कसे बनतात हे दाखवणारे प्र. के. अत्रे असतील. ध्येयासाठी हसतमुखाने फासावर चढणारे चाफेकर , राजगुरू असतील आणि तत्वासाठी गोळी खाणारे दाभोलकर, पानसरे देखील. एकीकडे ज्ञानेश्वर माउली लोकमान्य टिळकांना आणि विनोबांना घेऊन गीतेवर भाष्य करत असेल, तर दुसरीकडे तोच कर्मयोग आयुष्यभर जगणारे महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, बाबा आमटे ते भाष्य भक्तिभावाने ऐकत असतील.  बालगंधर्वांच्या समवेत भीमसेन असतील, सावरकरांसोबत आगरकर असतील, पु लं च्या बरोबर जी ए असतील, दादासाहेब फाळके असतील आणि त्यांच्याच नावाचा पुरस्कार जिंकणारे भालजी असतील, अख्खं मंगेशकर कुटुंब असेल…. आणि हा सगळा “मेळविलेला मराठा” बघून हर्षभरित होणारे समर्थ रामदास पण असतील! कुण्याही सहृदय माणसाने गहिवरून जावं असं हे कल्पनाचित्र…. एवढ्या उत्तुंग आणि वैविध्यपूर्ण व्यक्तीमान्त्वांच्या सावलीत आपण लहानाचे मोठे झालो, कळत नकळत त्यांच्या कर्तुत्वांचे संस्कार आपल्यावर घडत गेले या भावनेनं कृतार्थ होऊन जाण्याचा क्षण! म्हणून मला आजतागायत मराठी असल्याबद्दल अभिमान वाटण्यापेक्षा धन्यता वाटत आली आहे!
मराठी असण्याची खरी किंमत समजायची असेल तर माणसाने प्रथम महाराष्ट्राबाहेर पडावं! याचा अर्थ असा नाही की बाहेर सर्वत्र दलदल आहे आणि महाराष्ट्रच काय तो एक हिऱ्या-मोत्यांनी भरलेला आहे. पण बाहेरच्या जगाविषयी आपल्या बऱ्याचदा भुरळ पडणाऱ्या, फसव्या, मायावी कल्पना झालेल्या असतात. पर्यायाने आपण आपल्याजवळ जे आहे त्याला कमी लेखू लागतो, त्याची उपेक्षा करू लागतो. एकदा प्रत्यक्ष अनुभव घेतला म्हणजे मग आपले भ्रम दूर होतात. ज्या गोष्टींच्या शोधात आपण इथवर आलो, त्यातल्या अनेक गोष्टी आपल्याजवळ मुळातच होत्या हे समजत – फक्त त्या अघोषित होत्या इतकंच. आणि आपल्या कामाची घोषणाबाजी न करणे हा मराठी नेमस्तपणाचा भाग आहे (राजकीय पक्ष सोडून). मग कानठळ्या बसवणाऱ्या जाहिरातबाजीच्या जमान्यात, चोहोबाजूने जगभरातील विक्रेते अंगावर येत असताना, सामान्य मराठी माणूस या नव्या जगाच्या रेट्यात थोडं बावरून गेला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारख काही नाही! मग तो स्वतःच्या बाजूने परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करतो…  मराठीत वाक्यात बळेबळेच इंग्रजी शब्द कोंबतो, बिन तिखट-मसाल्याचा पिझ्झा कोक बरोबर गळ्याखाली ढकलतो, मोठ्या हॉटेल मध्ये गेला कि उगीचच वेटर शी हिंदीत मध्ये बोलतो ( वास्तविक वेटर पण मराठीच असतो पण दोघे झक मारत हिंदीत बोलतात).  आणि मग याचीच दुसरी बाजू आपलं दुखरेपण घेऊन समोर येते – “मराठी भाषा जगवायला हवी…”, “मराठी भाषेचा अभिमान बाळगा…”, “… आपल्याच घरी हाल सोसते मराठी”  इ. इ. सारखे संदेश मग मोबाईल मधून दशदिशांना चौखूर उधळतात.
वास्तविक ना मराठी असल्या हलक्यासलक्या गोष्टीनी संपणार आहे, ना कुणाला तीच महत्व मुद्दामहून पटवून देण्याची गरज आहे. भाषेच्या आणि समाजाच्या वाटेत जे चढउतार चालू असतात त्यातलाच हा एक तात्पुरता टप्पा आहे. ज्या प्रमाणे निखाऱ्यावर तात्पुरती राख जमते, तशी ही जाहिरातबाजीची, घोषणाबाजीची तात्पुरती काजळी आहे. पण आतमध्ये मराठीपणाचा वन्ही तसाच आहे, कधी सुप्त तर कधी प्रकट!
मराठीपण दिखाव्यापेक्षा दर्जाला जास्ती महत्व देते – म्हणून मराठी चित्रपटांचा नायक हा बॉलीवूड च्या खान मंडळीसारखा फार काही macho वगैरे असण्याची गरज नसते, पण त्याला अभिनय आला नाही तर मात्र प्रेक्षक अर्ध्यातून उठून जातील (बॉलीवूड चं गणित बरोबर उलट आहे).  आपल्याकडे हिरोइतका किंवा किंबहुना त्याच्या पेक्षा जास्ती दबदबा हा निळू फुले, श्रीराम लागू, दिलीप प्रभावळकर, डॉ मोहन आगाशे आदी नटश्रेष्ठांचा राहिला आहे.  आणि महाराष्ट्राने सिनेमापेक्षाही थोडं अधिक प्रेम नाटकावर केलं आहे.
मराठीपण गाण्यांच्या चाली इतकंच गाण्याच्या आशयाला महत्व देते – म्हणून आपल्याकडे भावगीतगायनासारखा प्रकार एवढा रुजला… गाण्यांच्या चाली जेवढ्या महत्वाच्या, तेवढेच गाण्याचे बोल महत्वाचे. ग. दि. माडगुळकर, इंदिरा संत, शांता शेळके, वसंत बापट, ना. धो. महानोर यांच्या सारखे प्रतिभावंत आपल्याला गीतकार म्हणून लाभले. अगदी दादा कोंडकेंनी लिहिलेली गीते देखील द्वयर्थी आहेत, पण अर्थशून्य नाहीत. मराठीतील चित्रपटगीते जेवढी आशयगर्भ असतात तेवढी बॉलीवूड ची सहसा नसतात, आणि इंग्रजी पॉप मध्ये तर अजून वाईट परिस्थिती आहे.
मराठीपण म्हणजे सामाजिक बांधिलकी – या सामाजिक बांधिलकी मुळे महाराष्ट्रात तळागाळात काम करणाऱ्या व्रतस्थ सुधारकांची/समाजसेवकांची जगाला हेवा वाटावी अशी परंपरा निर्माण झाली आहे. पूर्वी च्या काळी हि ज्ञानेश्वर-तुकाराम आदी संतांची परंपरा होती, जी पुढे विनोबा भावे, गाडगेबाबा, बहिणाबाई, महात्मा फुले, धोंडो केशव कर्वे यांनी समाजसुधारणेच्या माध्यमातून पुढे नेली. हे सगळे NGO वगैरे प्रकार सुरु व्हायच्या कित्येक आधीपासून! आणि आज त्याच परंपरेतून अण्णा हजारे, डॉ विकास आमटे, कै. डॉ. नरेंद्र दाभोलकर आदी लोकसेवक पुढे आले.
मराठी माणूस जन्मजात वाचक असतो. जसं बंगाली कुटुंबामध्ये हमखास हार्मोनियम सापडते, तशी मराठी कुटुंबांमध्ये थोडी फार का होईनात पण पुस्तके मिळणारच – मग ती स्वत:ची असोत किंवा इतर कुणाची! शिवाय रोजच वर्तमानपत्र आहेच. वाचन – मग ते अति गंभीर तत्त्वज्ञांनाविषयी असो किंवा निखळ विनोदी – पण ते वाचकाला एक वैचारिक बैठक देते. भारतातील काही प्रांतामधील लोकांना चहाचे कप समोर ठेवून कुठल्यातरी राजकीय/तात्विक मुद्यावर चर्चा  करण्याचे व्यसन आहे – यांत महाराष्ट्र अग्रभागी. ही चर्चा दिवाणखाना, दवाखाना, केशकर्तनालय, तरुण मंडळाचा कट्टा अशी कुठे ही होऊ शकते. पण ही अशी होणारी चर्चा आणि अवांतर वेळेत चालणारे वाचन यांचा परस्परसंबंध आहे. आणि या सगळ्याचे पर्यवसान हे सामाजिक बांधिलकी मध्ये होते. म्हणून महाराष्ट्रातील सण-उत्सवांचे स्वरूप अधिक सामाजिक स्वरूपाचे आहे. शिव-जयंती, गणेशोत्सव, दही-हंडी हे सगळे आहेतच, पण आपण दसरा किंवा संक्रांत पण घरी बसून साजरी करत नाही – चार घरे फिरून सोने/तिळगुळ देऊन येतो , या शिवाय हळदी-कुंकवाचे कार्यक्रम, मंगळागौर इत्यादी आहेतच. म्हणूनच एक समाज म्हणून , मराठी समाजाची वीण मला इतरांपेक्षा अधिक घट्ट वाटते. पण मी मघाशी म्हणल्याप्रमाणे, अशा गोष्टी जाणवण्यासाठी काही वर्षे तरी महाराष्ट्राबाहेर राहिलं पाहिजे.
मराठीपण म्हणजे साहित्य – साहित्याचे सर्व चषक इथे काठोकाठ भरलेले आहेत – मग तो कथा, कविता, कादंबर्या, नाटके, ललित , साहसकथा, प्रवासवर्णन काहीही असो. यात पु लं सारखे आनंदयात्री आहेत आणि जी ए सारखे गुढयात्र देखील. केशवसुत, बालकवी, कुसुमाग्रज यांच्यापासून चंद्रकांत गोखले, संदीप खरे पर्यंत समृद्ध काव्यदालन आहे. खांडेकर, माडखोलकर, नेमाडे सारखे तत्वचिंतक आहेत. रणजीत देसाई, शिवाजी सावंत, विश्वास पाटील यांच्या सारखे ऐतिहासिक-पौराणिक कादंबरीकार आहेत. ही न संपणारी यादी आहे…. मराठी भाषेत सध्या ४ ज्ञानपीठ विजेते आहेत (शिवाय १ कोकणी मध्ये) – हिंदी, कन्नड, बंगाली आणि मल्याळम च्या पाठोपाठ. कदाचित हि संख्या वाढली पण असती, मात्र पूर्वी ज्ञानपीठ पुरस्कार हा विशीष्ट साहित्यकृती ला दिला जात असे, साहित्यिकाच्या सर्वकष कामाला नव्हे. आता हा नियम बदलला आहे. जर पूर्वी पासून असा नियम असता तर कदाचित पु लं, वं पु, जी ए, कुरुंदकर या सारखे कुणी ज्ञानपीठ च्या पंक्तीत दिसले असते.
मराठीपण म्हणजे हे सगळं असण आणि यापेक्षा बरंच काही असण… ते किल्यांची पदभ्रमंती करण्यात आहे, पंढरीची वारी करण्यात आहे, शिवजयंतीला शिवज्योत घेऊन दौडत जाण्यात आहे आणि नवीन वर्षाच्या पहाटे अक्कलकोट ला जाऊन केलेल्या “श्री स्वामी समर्थ ” च्या गजरात आहे. हे मराठीपण एका रात्रीत घडलं नाही, शतकानुशतके वाहणाऱ्या प्रवाहाने खडकांना आकार द्यावेत तशी या संस्कृतीने मराठी मनाची जडणघडण केली आहे – ती बदलणे वरकरणी वाटलं तरी सोपं नाही. हे मराठीपण फ़क़्त मराठी बोलण्यापुरते नाही आहे, उलट मराठी भाषा हे ते मराठीपण व्यक्त करण्याचं साधन आहे. म्हणून जोपर्यंत मराठीपण आहे, तोपर्यंत मराठी भाषा राहणारच!